मुंबई : मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास आता सोपा होणार आहे. मुंबई ते विजयदुर्ग रो-रो फेरी लवकरच सुरु होणार आहे. यामुळे, मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर पाच-सहा तासांवर येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून ही सेवा सुरु करण्यात येणार असून कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये मुंबई ते विजयदुर्ग रो-रो फेरी सुरु करण्याची घोषणा केली होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे रखडले होते. आता सर्व अडचणी दूर झाल्या असून ही सेवा एका महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. तसेच, काम होताच चाचणी फेऱ्या सुरु होतील. जर या फेऱ्या यशस्वी झाल्या तर एप्रिल २०२६ पर्यंत ही सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाळ्यात मुंबईकरांना कोकणात जाण्यासाठी एक नवा पर्यायी मार्ग मिळणार आहे.
मुंबईतून गाडीने सिंधुदुर्गला पोहचण्यासाठी १० ते १२ तास लागतात. त्यात सुट्टी आणि सणासुदीच्या काळात तर हा वेळ आणखी वाढतो. जलमार्गे प्रवास करताना निम्मा वेळ वाचणार आहे. तसेच वाहतूक कोंडीशिवाय सुलभ प्रवास होईल. मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून थेट कोकण किनारपट्टीवरील विजयदुर्ग अशी ही सेवा असेल. या मार्गावरील प्रवासी जेट्टीचं रुपांतर आता रो-रो जेट्टीमध्ये करण्यात आलं आहे. या रो-रो जेट्टीमुळे प्रवासी आपली स्वतःची चारचाकी व दुचाकी वाहनं घेऊन जाऊ शकतात. यासाठी सर्व सुविधा विजयदुर्ग आणि मुंबई टर्मिनलवर सुरु करण्यात आल्या आहेत. या सेवेसाठी तिकिट दर अद्याप निश्चित केले नाही आहेत. परंतु, प्राथमिक अंदाजानुसार साधारणपणे ८०० ते १२०० रुपये प्रति प्रवासी तिकिट दर असू शकतात. शिवाय दुचाक्यांसाठी १००० रुपये तर चारचाकीसाठी ४५०० ते ६००० रुपये इतके तिकिट दर असू शकतात. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे ऑगस्टमध्ये गणेशोत्सवाच्या काही दिवसांपूर्वी ही सेवा सुरु होणार होती. पण तांत्रिक अडचणींमुळे हे काम त्यावेळी पूर्ण झाले नाही. तेव्हापासून नागरिक या सेवेच्या प्रतीक्षेत आहेत.







