मुंबई : एकीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल यायला काही तास बाकी असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. आयएल आणि एफएस या प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या नोटीशीनंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पाटील यांना त्रास देण्यासाठी ही नोटीस पाठवली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या नोटिशीनंतर जयंत पाटील काही वेळापूर्वी पहिल्यांदाच माध्यमांना सामोरे गेले. तसेच त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधिंनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.
जयंत पाटील म्हणाले, काल (१० मे) माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. काल संध्याकाली ५ वाजता ईडीने नोटीस पाठवली त्यांनतर ६ वाजता एका हवालदाराने नोटीस आणून मला दिली. नोटिशीमध्ये चौकशीला बोलावण्याचं काही कारण सांगितलेलं नाही. यात आयएलएफएस नावाच्या संस्थेचा उल्लेख आहे. त्यासंबंधीची ही केस आहे. त्या संस्थेशी संबंधित प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. माझा या संस्थेशी कधीच संबंध आला नाही. मी कधी त्यांच्या दारात गेलो नाही, कधी त्यांच्याकडून कर्ज घेतलं नाही, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही.
जयंत पाटील म्हणाले, “आता त्यांनी बोलावलं आहे म्हटल्यावर जावंच लागेल. मी त्यांच्या चौकशीला सामोरा जाईन. घरी सध्या लग्नसराई आहे, जवळची लग्नं आहेत, त्यामुळे मला उद्या चौकशीला जाणं शक्य नाही. म्हणूनच मी त्यानंतरची वेळ मागणारं पत्र पाठवून देईन.” यावेळी पत्रकारांनी पाटील यांना विचारलं की, ही नोटीस कशासाठी आली आहे. त्यावर पाटील म्हणाले, “ईडीची नोटीस कशासाठी येते हे भारतात सर्वांना माहिती आहे.”
सत्तासंघर्षाच्या निकालाच्या वेळीच नोटीस कशी काय आली असा प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले, त्यांना सोयीची वाटेल ती तारीख आणि वेळ ते (ईडी) देतात. कोणत्याही मनी लाँड्रिंग वगैरेशी माझा काही संबंध नाही, त्यामुळे चौकशीला जाण्यात णला काही अडचण वाटत नाही. आमदार जयंत पाटील म्हणाले, मिळालेली नोटीस कोणत्या प्रकरणी आहे हे माहित नाही, पण त्याचा फाईल नंबर काढून बघितला तर आयएफएससी नावाच्या कोणती तरी संस्था आहे आणि त्या संबंधात काही केस आहे. त्याच्याशी माझ्या कधी आयुष्यात संबंध आला नाही. पण ईडीने बोलावलं आहे म्हटल्यावर जावं लागेल.
काय आहे IL & FS प्रकरण ?
आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे. या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती.