मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०१४ पासून महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचे नेते अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या राजकीय खेळींनी भल्या भल्या अनुभवी राजकारण्यांनाही चितपट केले. पण देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो, महायुतीकडून आता मला जी जबाबदारी मिळेत ती मी पार पाडेन, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रीपदावर भाष्य केलं आहे. “मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो, आतापर्यंत केवळ दोन मुख्यमंत्र्यांनाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी, त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा इच्छा माझ्या मनात उरलेली नाही. आता महायुतीकडून मला जी जाबाबदारी देण्यात येईल, त्यात मी काम करेन. महायुतीकडून ज्याला मुख्यमंत्रीपद दिले जाईल, मी त्याच्या पाठिशी ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवण्यात रस आहे का, असे विचारले असता त्यांनी राजकारणात अशा चर्चा होत असतात, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला उत्तरे द्यायची नसतात, असे सांगत फडणवीसांनी यावर उत्तर देणे मात्र टाळले. आर्थिक क्षेत्रात काम करण्याचा मला आवड होती. वकिली माझे स्वप्न होते. पण ते भंगले. त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून विधानसभेत जनतेची वकिली करत आहे, असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले. याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही सडकून टीका केली. भाजप हा महायुतीतील सर्वात शक्तिशाली पक्ष आहे, महाविकास आघाडीचे नेते भाजपवर सातत्याने हल्ले करत आहेत. पण महाविकास आघाडीच्या थिंक टँककडून देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक टीका करा, त्यांची प्रतिमा मलिन करा, त्यामुळे भाजप आणि महायुतीची ताकद कमी होईल, असा सल्ला दिल्याचा दावाही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर जागा कमी पडल्यास उद्धव ठाकरे की शरद पवार यांपैकी कोणाला सर्वात आधी आमंत्रण देणार, असा प्रश्न विचारला असता, आम्हाला त्यांची गरजच पडणार नाही. तशी परिस्थितीच उद्भवणार नाही, आणि मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही आम्ही निकालानंतर ठरवू, २३ तारखेची वाट बघा,’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.





