ठाणे : भारतातील प्रमुख शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प राबवला जात आहे. महाराष्ट्रातही मेट्रोचं जाळं पसरवण्यात येत आहे. महाराष्ट्रात भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग उभारण्याची तयारी सुरू आहे. एमएमआरडीएनं बदलापूर ते कांजूरमार्ग या नवीन मेट्रो लाईनची योजना आखली आहे. ही लाईन देशातील सर्वात लांब मेट्रो मार्ग ठरणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएमआरडीए खासगी कंपन्यांसह भागीदारी करून हा प्रकल्प राबवणार आहे. प्रकल्पासाठी एमएमआरडीएने निविदा जारी केल्य़ा आहेत. या मेट्रोमुळे बदलापूर तसेच आसपासच्या भागातील लोकांचा मुंबईचा प्रवास सुखद आणि जलद होणार आहे. मेट्रो लाईनचे बांधकामाचे काम अंदाजे पाच वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती आहे. सध्या बदलापूर ते कांजूरमार्ग या मार्गावर वाहतूकीसाठी फक्त लोकल ट्रेन उपलब्ध आहेत. पावसाळ्यात लोकल ट्रेन थांबल्यामुळे प्रवाशांचा मुंबईशी संपर्क तुटतो. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही ३८ किलोमीटर लांबीची लाईन खूप महत्वाची आहे. या मेट्रोतून सुरूवातीला दररोज अंदाजे ७ लाख प्रवासी प्रवास करू शकतील. आयआयटी मुंबईनं या मेट्रोच्या डीपीआरचा अभ्यास करून याला हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच स्पेनच्या मिलान मेट्रो प्रशासनाने सार्वजनिक खासगी भागीदारातून मेट्रो बांधण्याची शिफारस केली आहे. ही मेट्रो लाईन सार्वजनिक आणि खासगी भागीदारी अंतर्गत उभारली जाणार आहे. एमएमआरडीएनं यासंदर्भात निविदा जारी केल्या आहेत. मात्र, अंतिम निर्णय राज्य सरकारकडे असेल. देशातील सर्व मेट्रो लाईन्स केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. त्यामुळे केंद्र सरकारलाही याची माहिती देण्यात येईल. हे सर्व टप्पे पार तसेच मान्यता मिळाल्यानंतर, बदलापूर – कांजूरमार्ग मेट्रो लाईनचे बांधकाम २०२६ मध्ये सुरू होऊ शकते.







