मुंबई : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर, भारताने पाकिस्तानची कोंडी करणारे ५ महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये पाकिस्तानच्या पाण्याची कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला (Indus Water Treaty) स्थगिती दिल्याचे घोषित केले. मात्र, २४ एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही आणि सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले असून, अटारी वाघा बॉर्डर १ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. परंतु, हा करार रद्द केल्याचं खोटा असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यानी केला आहे. पाकिस्तानला पाणी बंद करण्यासंदर्भातील दिलेल्या पत्राचा उल्लेख करत या पत्रात कुठेही पाणी बंद करण्याचा उल्लेख नाही. याचाच अर्थ, इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.







