मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं. यानंतर महाविकास आघाडीतले मतभेदही उघड झाले. अगदी गेल्या काही दिवसांमध्येच स्वबळावर महापालिका निवडणुका लढवण्याचीही भाषा मविआच्या नेत्यांनी केली. तसंच लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही गाफिल राहिलो असंही काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीतले वादही समोर आले. दरम्यान मागच्या महिन्यात जे हिवाळी अधिवेशन झालं त्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसंच आदित्य ठाकरेही दोन ते तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांना भेटले. यानंतर काही वेगळी समीकरणं दिसणार का? अशा चर्चा सुरु झाल्या. दरम्यान याबाबत अमृता फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी एक उत्तर दिलं आहे. जे चर्चेत आहे.
विधानभा निवडणुकीचा जो प्रचार करण्यात आला त्यावेळी भाजपाच्या विरोधात उद्धव ठाकरेंची कठोर भूमिका दिसली. एवढंच काय एक तर तू राहशील किंवा मी राहिन असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. ज्या आव्हानाला देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने उत्तर दिलं. राजकारण कुणीही संपत नसतं तेही राहतील आणि मी देखील राहिन . कुणाला हटवायचं असेलच तर तो निर्णय जनता घेत असते असं देवेंद्र पडणवीस म्हणाले होते. दरम्यान उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जी काही टीका केली होती त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जाणं ही बाब राजकीय घडामोड म्हणून पाहिली जाते आहे. याबाबत अमृता फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी सूचक विधान केलं आहे. तसंच भाजपाचं सरकार आल्यावर जातीय तेढ निर्माण होते का? या प्रश्नावरही उत्तर दिलं.
“मला वाटतं की, देवेंद्र फडणवीस असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळे प्रगतीचं राजकारण करतात. जातीय राजकारण आपण आणतो, आपण ते नाही केलं पाहिजे. लोकांच्या हातात ही बाब आहे, माध्यमांच्या हातात आहे असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंची भूमिका बदलते आहे का? असं विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या, “नेत्यांमध्ये जे काही मतभेद आहेत ते विचारधारांबाबत आहेत. वैयक्तिक पातळीवर ते मतभेद नाहीत. वैचारिक मतभेद असल्याने एकेकाळचा शत्रू हा मित्र होतो, मग परत शत्रू होतो, परत मित्र होतो अशी कितीतरी उदाहरणं आहेत.” असं अमृता फडणवीस म्हणाल्या. शरद पवार हे दिग्गज नेते आहेत. त्यांचं विश्लेषण खूप चांगलं असतं. आरएसएस बाबत ते जे बोलले ते चांगलंच विश्लेषण त्यांनी केलं मला त्याचा आनंद आहे असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.







