मणिपूर : इशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळल्याने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून मोबाईल इंटरनेट सेवा पाच दिवस बंद ठेवण्यात आली आहे. येथे हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या असून पोलीस तसेच संरक्षण यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हाच मुद्दा घेऊन विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून मणिपूमधील हिंसाचार हे अमित शाह यांचे अपयश आहे, अशी टीका करत आहेत. विशेष म्हणजे अमित शाह यांनी केंद्रीय गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
“केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शाह हे सपेशल अपयशी ठरले आहेत. अगोदर आसाम आणि मिझोरम या राज्यांत वाद झाला. कर्नाटक-महाराष्ट्र या दोन राज्यांतही वाद झाला. आता मणिपूर हे राज्य धुमसत आहे. त्यामुळे अमित शाह यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा,” अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच मोदी यांनी कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त राहण्यापेक्षा मणिपूर येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा खोचक सल्लाहेखील काँग्रेसने दिला आहे. राज्यसभेचे सदस्य तथा आरजेडी पक्षाचे नेते मनोज झा यांनीदेखील मणिपूरमधील हिंसक कारवायांवर भाष्य केले आहे. त्यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे. केंद्र तसेच राज्य सरकार मणिपूरमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलेले आहेत, असा दावाही मनोज झा यांनी केला.





