ठाणे : भारत पाकिस्तान युद्धबंदी लागू झाली आहे. यामुळे सीमा भागांमध्ये सध्या वातावरण शांत असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांचे शौर्य आणि हिम्मत दाखवून दिली आहे. यामुळे ऑपरेशन सिंदूरची पूर्ण जगामध्ये चर्चा आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील आदमपूर येथे एअरबेसला भेट देखील दिली. यावेळी त्यांनी सैन्याचे मनोबल वाढवले. यानंतर राज्यामध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तिरंगा रॅली काढून ऑपरेशन सिंदूरचा विजयोत्सव साजरा केला आहे.
ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला आहे. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी तिरंगा रॅली काढली. शासकीय विश्राम गृह येथून ही रॅली सुरू झाली. यावेळी हातामध्ये तिरंगा घेऊन भारत माता की जय आणि सैन्याच्या नावाचा जयघोष करण्यात आला. तसेच भारतीय सैन्याचे धन्यवाद देखील मानण्यात आले. यावेळी तरुणांमध्ये अनोखा उत्साह दिसून आला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शिंदे गटाचे इतर नेते देखील उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतावर डोळे वटारले तर खात्माच केला जाईल. भारताकडे पाकिस्तानने वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये, अशाप्रकारचे शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी प्रतिक्रिया ठाण्यात तिरंगा रॅलीदरम्यान दिली.







