वसई : अर्नाळा किल्ला हा पालघर जिल्ह्याचा ऐतिहासिक जलदुर्ग सध्या मद्यपी आणि असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनत असल्याचे समोर आले आहे. ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ने राबवलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आणि गांजा सेवनाचे पुरावे आढळल्याने दुर्गप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विरारजवळील अर्नाळा बेटावर वसलेला हा किल्ला सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापार आणि संरक्षणासाठी बांधला होता. ऐतिहासिक महत्त्वामुळे तो पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असला, तरी गेल्या काही वर्षांत पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे किल्ल्याची अवस्था खालावल्याचे दिसून येत आहे. २६ एप्रिल रोजी झालेल्या मोहिमेत सुमारे चार एकर परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छतेदरम्यान प्लास्टिक कचऱ्यासोबत सिगारेट पाकिटे, पानमसाल्याचे पाऊच आणि हजारो रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या. काही ठिकाणी किल्ल्याच्या बुरुजांमध्ये मुद्दाम बाटल्या खुपसून ठेवल्याचेही दिसले. तसेच अंधाऱ्या भागात गांजा सेवनासाठी वापरले जाणारे साहित्यही मोठ्या प्रमाणात सापडले. त्यामुळे किल्ल्यावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि नियमित स्वच्छता ठेवणे अशा मागण्या पुढे आल्या आहेत. स्थानिकांच्या मते, सायंकाळनंतर बेटावर मद्यपींचा वावर वाढतो आणि अंधाराचा फायदा घेत खुलेआम नशा केली जाते. यामुळे पर्यटक, विशेषतः महिलांना असुरक्षित वाटत असून किल्ल्याची प्रतिमा मलिन होत आहे. पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची टीका होत आहे.







