पुणे : महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातही रविवारी जोरदार पावसानं थैमान घातलं. पुणे शहरासह बारामती, दौंड परिसरात अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः बारामतीत पावसाचं मोठं नुकसान झालं आहे.
बारामती शहरातील नीरा डावा कालवा फुटल्यामुळे पाणी प्रचंड वेगाने पालखी महामार्गावर आले आणि काटेवाडी-भवानीनगर रस्ता बंद करण्यात आला. या भागातील दीडशेहून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं असून, अनेक कुटुंबांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवारी) भल्या पहाटे बारामतीत भेट देऊन पूरग्रस्त भागांची पाहणी केली. दौंड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली भागात पाणी साचलं आहे. या दरम्यान एका इनोवा गाडीला पुराच्या पाण्याचा फटका बसला आणि ती वाहून गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.







