नवी दिल्ली: भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत त्याच्या रस्ते अपघातामुळे टीम इंडियातून बराच काळ बाहेर आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याचा भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ऋषभ नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या फिटनेसवर काम करत आहे. भारतीय संघाला मधल्या फळीत वेळोवेळी ऋषभ पंतची कमी भासली आहे. पण आता ऋषभ पंतच्या टीम इंडियातील पुनरागमनाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. ऋषभ पंत हा इंग्लंड मालिकेपूर्वी भारतीय संघात परतण्याची शक्यता आहे. भारत पुढील वर्षी जानेवारीमध्ये मायदेशात इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. स्पोर्ट्स टुडेच्या वृत्तानुसार, पंत पुढील वर्षी आयपीएलमध्येही खेळणार आहे. २०२३ च्या सुरुवातीला अपघात झाल्यापासून पंत क्रिकेटपासून दूर आहे.
अपघातानंतर ऋषभ पंतला अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, पंतने आता चालायला सुरुवात केली आहे आणि अहवालानुसार तो लवकरच फलंदाजी देखील सुरू करेल. पंतच्या पुनरागमनाची बातमी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण तो सामना विजेता आहे आणि जगभरातील क्रिकेट चाहते या खेळाडूला मैदानावर पाहण्याची वाट पाहत आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये पंतवर मुंबईत डॉ. दिनशॉ परडीवाला यांच्या देखरेखीखाली शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर, पंतने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. भारतीय यष्टीरक्षकाने त्याच्या सोशल मीडियावर १ जुलै रोजी एका पोस्टमध्ये त्याच्या अपघाताला त्याचा ‘दुसरा जन्म’ असे वर्णन केले.
दुर्दैवी अपघातानंतर पंतला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी, आयपीएल आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसारख्या मोठ्या स्पर्धांना मुकावे लागले. भारतात होणाऱ्या आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही तो सहभागी होऊ शकणार नाही. ऋषभ पंतने ३३ कसोटी सामने खेळले असून ४३.६७ च्या सरासरीने २२७१ धावा केल्या आहेत ज्यात ५ शतकांचा समावेश आहे. या ३३ कसोटी सामन्यांमध्ये त्याने संघासाठी काही संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये त्याने ३० सामने खेळले आहेत आणि ३४ च्या सरासरीने ९६५ धावा केल्या आहेत.