पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठी आश्वासने दिल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीने पुणेकरांना मोफत मेट्रो आणि बसच्या मोफत प्रवासाचे आश्वासन दिले आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे पुणेकरांचे पेट्रोलचे दररोज साडेसात कोटी रूपये वाया जातात,तर वर्षाला दहा हजार कोटी पेट्रोलसाठी वाया जातात. पण मेट्रो आणि बस प्रवास मोफत झाला तर रस्त्यावरील वाहने कमी होतील, यातून पुणे प्रदुषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल करेल. हेच पैसे मेट्रो आणि बससाठी वापरता येतील, हे मी अनेक तज्ज्ञांशी बोलून मी सांगत आहे, असा प्लॅन अजित पवार यांनी सांगितला आहे. तसेच आगामी निवडणुकीत पुणे महापालिका आमच्या ताब्यात दिली तर मी मोफत मेट्रो करून दाखवेन, असही अजित पवारांनी म्हटलं आहे.
आम्ही पुण्यात राहत असल्यामुळे आम्हालाही पुणेकरांबद्दल जिव्हाळा आहे. बाहेरचे कोणी आले तर ते तेवढ्यापुरतेच येतील त्यामुळे आम्हालाच संधी द्या, असंही अजित पवरांनी म्हटलं आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी विविध विकासात्मक आश्वासने दिली आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या सोयी-सुविधांवर भर देत त्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अजित पवार यांनी मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यात येणार असून, ‘टँकरमुक्त पुणे’ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. शहरातील अपूर्ण असलेले ‘मिसिंग लिंक’ रस्ते पूर्ण करण्यात येणार असून, कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. आरोग्य सुविधांच्या दृष्टीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासह टेलिमेडिसिन सुविधा उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय, गुंठेवारी नियमितीकरणाची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण केली जाणार असून, १५० मॉडेल शाळांना मंजुरी देण्याची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे. या घोषणांमुळे पुणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
अजित पवार म्हणाले, आज मी नेता म्हणून नाही, तर पुणेकर म्हणून बोललो. कारण जिथं आपलेपणा असतो, तिथं कारणं दिली जात नाहीत. तिथं जबाबदारी घेतली जाते. गेल्या सहा महिन्यांत वॉर्डनिहाय सर्वेक्षण, पुणेकरांशी थेट संवाद आणि त्यांच्या रोजच्या समस्या समजून घेत हा ठोस वचनांचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
- या जाहीरनाम्याचा पाया आहे “पाच काम – पक्का वादा”.
दररोज नळाद्वारे, पुरेशा दाबासह पाणीपुरवठा.. टँकर माफियांवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही. पाण्याची गळती थांबवून पाईपलाईन उन्नतीकरण आणि वेळेत दुरुस्त्या करणार. - रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणार. मिसिंग लिंक प्रकल्प आणि विकास आराखड्यातील रस्ते ठराविक कालमर्यादेत पूर्ण करणार. नव्यानं समाविष्ट गावांमध्येही शहरमानकांनुसार रस्ते उभारणार.
- पुणे खड्डेमुक्त शहर करणार. खड्डे बुझवण्यासाठी कंत्राटदाराला वेळेची मर्यादा राहणार. कामाकडे दुर्लक्ष केल्यास दंड आणि संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार. टिकाऊ रस्ते उभारण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार.
- स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन कामकाज नीट होणार. आज निर्माण होणाऱ्या ९८० MLD सांडपाण्यापैकी प्रक्रिया क्षमतेतील तफावत भरून काढत नद्यांमध्ये जाणारं प्रदूषण थांबवणार. स्वच्छता ही मोहीम नव्हे, तर दररोजच्या कामातील व्यवस्था बनणार.
- आरोग्यसेवा सुलभ आणि परवडणारी होणार. वॉर्डनिहाय दवाखाने, सुधारित व नवीन रुग्णालये, खाटांची वाढ, मातृसेवा, कर्करोग उपचार, बर्न वॉर्ड, ICU, टेलिमेडिसिन आणि गरीबांसाठी विमा सहाय्य सेवा उपलब्ध राहणार.







