ओव्हल : लंडनमधील ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत डब्ल्यूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युतरात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १५१ धावा केल्या होत्या. सध्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु असून अजिंक्य रहाणे अर्धशतक झळकावून भारतीय संघाचा डाव सावरला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने दाखवून दिले की तो टीम इंडियाचा एक विश्वासार्ह फलंदाज का आहे. रहाणेचे कसोटी संघात पुनरागमन हा योगायोग होता. कारण श्रेयस अय्यर जखमी झाला होता आणि त्याने देशांतर्गत हंगामात तसेच आयपीएल २०२३ मध्ये चांगली कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा तसेच केएस भरत यांसारखे फलंदाज फ्लॉप ठरले, तर रहाणेने आपली योग्यता सिद्ध केली.
अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात ९२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारतासाठी अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने पॅट कमिन्सच्या चेंडूवर षटकार ठोकून आपले कसोटी अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने ५१२ दिवसांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असून त्याचे पुनरागमन संघासाठी फायदेशीर ठरले. वृत्त लिहेपर्यंत तो अर्धशतकी खेळी खेळून क्रीजवर उपस्थित होता. रहाणेचे कसोटी क्रिकेटमधील हे २६ वे अर्धशतक होते. एवढेच नाही तर कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० चेंडूंचा सामना करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.





