मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी (पूर्व प्राथमिक) आणि इयत्ता आठवी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर केला. यंदा दोन्ही परीक्षांचा एकत्रित निकाल २२.९७ टक्के लागला असून, इयत्ता पाचवीचा निकाल २४.७४ टक्के तर इयत्ता आठवीचा निकाल १९.९४ टक्के इतका आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे वैयक्तिक निकाल तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विद्यमान स्वरूपातील या शिष्यवृत्ती परीक्षेचे हे अखेरचे वर्ष ठरणार असल्याची माहितीही परिषदेकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी रोजी राज्यभरात ही परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी एकूण १० लाख ४४ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी इयत्ता पाचवीसाठी ६ लाख ५७ हजार १७६, तर इयत्ता आठवीसाठी ३ लाख ८७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. प्रत्यक्ष परीक्षेला इयत्ता पाचवीचे ६ लाख ३६ हजार ५८० आणि इयत्ता आठवीचे ३ लाख ७३ हजार ९६१ असे एकूण १० लाख १० हजार ५४१ विद्यार्थी उपस्थित राहिले. परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २ लाख ३२ हजार २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी ३३ हजार २८० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवीचे १६ हजार ६९३, तर इयत्ता आठवीचे १६ हजार ५८७ विद्यार्थी आहेत. परीक्षेतील निकालाची टक्केवारी अनुक्रमे २४.७४ आणि १९.९४ इतकी नोंदविण्यात आली आहे.
परिषदेने यापूर्वी १८ मे रोजी या परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर केला होता. त्यानंतर १८ ते २७ मे या कालावधीत शाळांमार्फत गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी करून त्यावरील निर्णयानंतर अंतिम निकाल तयार करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांचा बैठक क्रमांक आणि आईचे नाव नमूद करून परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर अंतिम निकाल पाहता येणार आहे. तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिषदेने स्पष्ट केले आहे की, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र पाहण्यासाठी बँक खात्याची माहिती आणि आधार क्रमांकाची नोंद करणे आवश्यक राहील. ही माहिती पूर्ण केल्यानंतरच प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. मात्र, गुणवत्ता यादीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचा शिष्यवृत्ती संच प्रकार आणि पात्रतेचा तपशील स्वतंत्रपणे पाहता येईल. अंतिम निकाल जाहीर झाल्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपुष्टात आली असून, पात्र विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.







