नवी मुंबई : उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपीला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी दाऊद शेखला पनवेल सेशल कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याची रवानगी पोलिस कोठडीमध्ये केली आहे. आरोपीविरोधात ४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशश्रीच्या हत्येनंतर दाऊद शेखला चौथ्या दिवशी कर्नाटकातील गुलवर्गा येथून अटक करण्यात आली होती. आरोपीने यशश्रीच्या हत्येची कबुली दिली आहे. संपूर्ण महराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणी उरण पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला अटक केली. त्यानंतर त्याला उरण येथे पोलिस घेऊन आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता दाऊने गुन्ह्याची कबुली दिली. लग्नाला नकार दिला म्हणून यशश्रीची हत्या केली असल्याचे त्याने कबूल केले, दाऊद विरोधात पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता यशश्रीला शिवीगाळ केल्याप्रकरणी दाऊद शेखविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती समोर आली आहे, ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम हे यशश्री शिंदे हत्या प्रकरण हाताळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी याप्रकरणाची सर्व माहिती त्यांनी घेत चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यावे असे आयुक्तांना आम्ही सांगितले. उज्वल निकमांची आम्ही नियुक्ती केली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. दरम्यान, यशश्री शिंदे आणि दाऊद शेख एकमेकांना ओळखत होते. यशश्री उरणमध्ये ज्याठिकाणी राहत होती त्याठिकाणीच दाऊद देखील राहत होता. त्यांच्यामध्ये ३ ते ४ वर्षापासून मैत्री होती. पण २०१९ मध्ये यशश्रीच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरोधात तक्रार केली होती. त्यावेळी त्याच्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दाऊदला पोलिसांनी अटक केल्यानंतर तो जेलमध्येही गेला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर तो कर्नाटकला निघून गेला होता. पण पुन्हा यशश्री आणि दाऊद यांच्यामध्ये संपर्क सुरू झाला होता. दोघेही एकमेकांना कॉल करत होते. दाऊद उरणमध्ये आल्यानंतर त्याने यशश्रीशी फोनद्वारे संपर्क केला. त्यावेळी दोघांनी भेटायचे देखील ठरलं होतं. या भेटीवेळी यशश्रीने लग्नाला नकार दिला त्यामुळे संतप्त झालेल्या दाऊदने तिची हत्या केली.