मुंबई : मुंबईत जन्म होवून आता म्हातारे होवू लागलात, तरी येथील एकही समस्या सोडवू शकला नाहीत, असे टीकास्त्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव व राज ठाकरे बंधूंवर अंधेरी येथील प्रचार सभेत शुक्रवारी सोडले.
फडणवीस व अन्य भाजप नेत्यांचा जन्म मुंबईत झाला नाही. त्यामुळे त्यांना मुंबईचे प्रश्न आणि विकासाची माहिती नाही. आमचा जन्म मुंबईत झाल्याने आम्हाला मुंबईच्या समस्या माहीत आहेत, अशी टीका ठाकरे बंधूंनी फडणवीस यांच्यावर केली होती. त्याचा उल्लेख करुन फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईची संकल्पना व विकासाच्या मुद्द्यांची पूर्णपणे माहिती होती. पण बाळासाहेबांचा जन्म पुण्यात झाला होता. ज्यांचा जन्म मुंबईत झाला, ते आता म्हातारे होवू लागले, तरी मुंबईची एकही समस्या सोडवू शकले नाहीत. ते आज मुंबईसाठी केलेले एकही काम दाखवू शकत नाहीत. मराठी माणूस, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी काय केले, ते दाखवू शकत नाहीत. मग केवळ मुंबईत जन्माला आले, म्हणून तुम्हाला हारतुरे घालायचे का, असा सवाल फडणवीस यांनी केला.







