मुंबई : दिवाळीच्या सणामध्ये मुंबईसह देशभरातील वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. हवेची गुणवत्ता देखील अत्यंत खराब झाली आहे. अशातच देशभरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिवाळी सणादरम्यान फटाक्यांच्या वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिवाळीत फटाके फोडण्यासाठी महापालिकेने काही नियम ठरवले असून, त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. मुंबईतील वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने महापालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे आणि फटाके या समस्येला कारणीभूत आहेत असे महापालिकेने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईकर रात्री १०.०० नंतर फटाके फोडू शकणार नाहीत. याशिवाय कमी फटाके वाजवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. फटाके रस्त्यावर आणि गर्दीच्या ठिकाणी न फोडता मोकळ्या जागेत फोडावेत, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. “देशभरात प्रदूषण झपाट्याने वाढत असून, मुंबईतील हवेची गुणवत्ताही लक्षणीयरीत्या खालावली आहे. दिवाळीच्या सणाच्या वेळी लोक फटाके वाजवतात, जे वायू प्रदूषणात योगदान देत आहेत. त्यामुळे फटाके शक्य तितक्या कमी प्रमाणात फोडावेत, जेणेकरून वायू आणि ध्वनी प्रदूषण काही प्रमाणात कमी करता येईल. फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध, दम्याचा त्रास असलेल्या लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे,” असेही सांगण्यात आलं आहे.
मुंबई महापालिकेची नियमावली
त्याचबरोबर प्रदूषण लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन पुढीलप्रमाणे आवाहन करत आहे.
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. प्रकाशासह उत्सव साजरा करण्यास प्राधान्य देऊन ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळा
आवाज विरहीत फटाक्यांच्या वापरास प्राधान्य द्यावे.
असे फटाके फोडले पाहिजेत ज्यामुळे कमीत कमी वायू प्रदूषण होते.
रात्री १०.०० वाजेपर्यंतच फटाके फोडा.
ज्येष्ठ नागरिक आणि आजारी असलेल्यांची जबाबदारी लक्षात घेऊन मोठ्या आवाजाचे फटाके वाजवणे टाळा.
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
फटाके फोडताना सुती कपडे घालावेत, सैल (मोठे) कपडे वापरू नयेत.
फटाके फक्त मोकळ्या जागेतच जाळावेत.
गर्दीच्या ठिकाणी आणि रस्त्यावर फटाके फोडू नयेत.
फटाके फोडताना लहान मुलांनी मोठ्यांसोबत असणे गरजेचे आहे.
फटाके फोडताना सुरक्षिततेच्या कारणास्तव पाणी, वाळू इत्यादींनी भरलेली बादली ठेवा.
फटाके पेटवताना कोरडी पाने, कागद किंवा इतर कोणतेही साहित्य जाळू नये.