ठाणे : बेकायदेशरित्या भारतात प्रवेश केलेल्या दोन बांगलादेशींना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. रमजान शेख (३२) आणि कबीर शेख (४०) अशी अटकेत असलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. दोघेही भिवंडी शहरात नळ जोडणीचा व्यवसाय करत होते. त्यांनी भारतात प्रवेश कसा मिळविला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
भिवंडी येथील खोका कंपाऊंड परिसरातील झोपडपट्टीमध्ये बांगलादेशी वास्तव्य करत असल्याची माहिती भिवंडी शहर पोलिसांना मिळाली होती. याबाबत पोलिसांनी तपास केला असता, रमजान आणि कबीर हे दोघेही भाड्याच्या घरामध्ये राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी ते बांगलादेशी असल्याचे कबूल केले. दोघेही बांगलादेशातील नानपुर भागातील आहेत. त्यांच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम १९२० चे कलम ३,४ सह विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १३,१४ अ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात त्यांना अटक झाली आहे.





