मुंबई : एकल प्लास्टिक वापरावर बंदी असतानाही बाजारात जागोजागी प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक दुकानदार, फेरीवाले तसेच ग्राहक सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याने महानगरपालिका प्रशासनाने प्लास्टिकविरोधातील कारवाई थंडावली का, असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका पर्यावरणाला बसत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
धुलीवंदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या, फुग्यांचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचना २०१८ नुसार एकल वापराच्या प्लास्टिक वस्तू उत्पादन, वापर, वाहतूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री आणि साठवणूक यावर बंदी आहे. तसेच, केंद्र शासनाने ‘सिंगल यूज प्लास्टिक अधिसूचना २०२१’ नुसारही प्लास्टिक वस्तुंचे उत्पादन, उपयोग, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवण प्रतिबंधित आहेत. मुंबईत महापालिका प्रशासनाने ऑगस्ट २०२३ मध्ये पर्यावरण विभागाच्या सूचनेनुसार प्लास्टिकविरोधातील कारवाई तीव्र केली होती. त्यांनतर काही महिन्यातच बाजारात पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर वाढला. अद्यापही प्लास्टिकविरोधातील कारवाईची कठोर अंमलबजावणी झाली नसल्याने धुळवडीच्या दिवशी निदर्शनास आले. धुळवडीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या आणि फुग्यांचा, तसेच रंगांच्या वेष्टनासाठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला.







