मुंबई : मुंबईतील वाकोला येथील धोबीघाट परिसरातील मासळी बाजारात मुंबई महानगरपालिकेच्या नव्या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. बाजारात मासे कापणे आणि स्वच्छ करून देण्यावर तातडीने बंदी घालण्यात आल्याने कोळी समाज आणि मासळी विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मासे कापल्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होते आणि दुर्गंधी पसरते, असे कारण देत पालिकेने विक्रेत्यांना केवळ अख्खे मासे विकण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता हा निर्णय लादण्यात आल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. कोळी महिलांच्या मते, बहुतांश ग्राहक कापलेले आणि स्वच्छ केलेले मासे खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे हा नियम लागू झाल्यास ग्राहक कमी होतील आणि व्यवसायावर थेट परिणाम होईल. “पिढ्यानपिढ्या चालत आलेला आमचा व्यवसाय एका आदेशाने कसा बंद करता येईल?” असा सवाल विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे. तसेच “मटण आणि चिकन कापताना घाण होत नाही का? मग केवळ मासळी विक्रेत्यांवरच कारवाई का?” असा रोषही कोळी बांधवांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे वाकोला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पालिकेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापले असून विविध नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुंबईच्या महापौर रितु तावडे यांनी “अशी कारवाई झाली असेल तर ती योग्य नाही, या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून तोडगा काढला जाईल,” असे सांगितले. तर विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी “लोकांनी काय खायचे आणि कसे खायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रशासनाला नाही,” असे म्हणत निर्णयावर टीका केली. ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनीही या निर्णयावर जोरदार आक्षेप घेत “कोळी समाज हा मुंबईचा मूळ रहिवासी असून त्यांच्या उपजीविकेवर घाला घालण्याचे काम सुरू आहे,” असा आरोप केला. “जर माशांमुळे अस्वच्छता होत असेल, तर मग चिकन खरेदी करताना लोकांनी जिवंत कोंबडी घरी घेऊन जायची का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पावसाळ्याच्या तोंडावर आणि सणासुदीच्या काळात ही बंदी लागू करण्यात आल्याने कोळी समाज अधिक आक्रमक झाला आहे. पालिकेने तातडीने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विक्रेत्यांनी दिला आहे. मुंबईच्या सांस्कृतिक आणि खाद्यपरंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या कोळी महिलांवर अशा प्रकारची सक्ती करणे अन्यायकारक असल्याची भावना नागरिकांमधूनही व्यक्त होत आहे.







