मुंबई : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कांबळे आणि समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते व्यसनमुक्तीविषयक पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक परिणामांबाबत माहिती देताना डॉ. कांबळे यांनी विशेषतः २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे नमूद केले. युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती आणि सामूहिक सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नशाबंदी मंडळाचे चिटणीस व मुख्य संघटक अमोल स. भा. मडामे यांनी महाराष्ट्र हे २०११ मध्ये व्यसनमुक्ती धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगितले. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमादरम्यान ‘कल्याणयात्रा – व्यसनमुक्तीच्या गाथा’ या मासिकाच्या मे २०२६ अंकाचे तसेच तंबाखूमुक्ती विषयक पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले. विविध संस्थांच्या स्टॉलना भेट देऊन डॉ. कांबळे आणि आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पोस्टर्स, पत्रके आणि माहितीपर कटआऊटच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम आणि ‘तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा २००३’ विषयी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. कार्यक्रमात सलाम मुंबई फाऊंडेशन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांसह अनेक संस्थांनी सहभाग घेत व्यसनमुक्तीचा संदेश दिला.







