वूत्तसंन्था : भारताला नमवत अखेरीस ऑस्ट्रेलियाने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विजय नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव करत मोठा विजय नोंदवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये २-१ ने आघाडी मिळवली आहे. भारतीय संघाच्या कमजोर फलंदाजीने या सामन्यात संघाला पराभव मिळवून दिला आहे. एका क्षणाला भारतीय संघ हा कसोटी सामनाही ड्रॉ करेल अशी आशा होती, पण भारताच्या फलंदाजांनी या निर्णयावर पाणी फेरलं आहे. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ १५५ धावांवरच आटोपला. भारताच्या ७ फलंदाजांनी तासाभरात एकापाठोपाठ आपल्या विकेट्स गमावल्या. एकूण ३०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागण्याची ही कसोटी क्रिकेटमधील ४९वी वेळ आहे.
चौथ्या दिवशी ९ गडी गमावून ३३३ धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५व्या दिवशी आपल्या धावसंख्येत आणखी ६ धावांची भर घातली आणि भारताला ३४०धावांचे लक्ष्य दिले. मेलबर्नच्या मैदानावर हे विजयी लक्ष्य गाठणं टीम इंडियासाठी मोठे आव्हान होते, कारण आतापर्यंत या मैदानावर सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग ३३२ धावांचा होता. पण भारताच्या युवा फलंदाजांनी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत कसोटी ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला पण ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे फलंदाजांनी शरणागती पत्करली.





