मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर पुढे नक्की काय करावं? कोणत्या क्षेत्रात करिअर केल्यावर यश मिळेल? अशा प्रश्नांनी विद्यार्थी आणि पालकांचं मन गोंधळलेलं असतं. हाच संभ्रम दूर करण्यासाठी राज्य शिक्षण विभागाच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी मोफत समुपदेशन व मार्गदर्शन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेकदा विद्यार्थी मित्रांच्या प्रभावाखाली किंवा पालकांच्या दबावाखाली चुकीची शाखा निवडतात. मात्र, या उपक्रमात विद्यार्थ्यांची आवड, त्यांची बौद्धिक क्षमता आणि कल नेमका कोणत्या क्षेत्राकडे आहे, हे मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे तपासले जाईल. एप्रिल महिन्यात या चाचण्या आणि त्यानंतर वैयक्तिक समुपदेशन केले जाणार आहे. या मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना १४ मार्चपर्यंत नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण कार्यालय, एल्फिस्टन टेक्निकल हायस्कूल परिसर, सेंट झेवियर कॉलेजच्या शेजारी, फोर्ट, मुंबई, येथे संपर्क साधावा.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- परीक्षेच्या हॉल तिकिटाची छायांकित प्रत.
- शाळेचा आणि घराचा पत्ता.
- मोबाईल क्रमांक
या समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानशाखांची माहिती मिळणार नाही, तर विविध प्रवेश परीक्षा, आर्थिक बाजू आणि उपलब्ध अभ्यासक्रम या सर्व पैलूंचे स्पष्ट चित्र पालकांसमोर येईल. “विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेनुसार योग्य करिअर मार्ग निवडावा, यासाठी हा उपक्रम पूर्णपणे मोफत राबविला जात आहे,” असे प्राधिकरणाच्या प्राचार्या मनीषा पवार यांनी सांगितले.







