मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल आहे. राज्यातील २० नोव्हेंबरल मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडीनांही वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटपही जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असतानाही महायुतीत मात्र जागावाटपाचं घोडं अद्यापही अडलेलचं दिसत आहे. त्यावरून महायुतीतीत तीनही पक्षात धुसफूस अद्यापही सुरूच आहे. अशातच ” त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला. पण आता तुम्ही झुकते माप घ्या..’ असे विधान अमित शाहा यांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून केलं आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपासंदर्भात दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुतीतील मित्रपक्षांचा आदर राखण्याच्या सुचना दिल्या. इतकेच नव्हे तर, एकनाथ शिंदेंना मवाळ भूमिका घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. जागावाटपाच्या बाबतीत मुख्यमंत्री शिंदे १०० पेक्षा कमी जागांवर तडजोड करण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अमित शाहांनी एकनाथ शिंदे यांना जागावाटपाच्या चर्चेत सौम्य भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे. या देशात पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री ही दोन पदे महत्त्वाची आहेत. गृहमंत्र्यांसह इतर सर्व पदे ही केवळ व्यवस्था आहे. काम पूर्ण करण्यासाठी ही यंत्रणा आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले, तुमच्यासाठी आमच्या लोकांना बलिदान द्यावे लागले, त्यामुळे तुमच्या मित्रपक्षांना जागा वाटप करून तुम्ही मोठे मन दाखवावे, असे अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना सांगितल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत सामील झाल्यानंतर जागावाटपात भागीदारी वाढली आहे, हे विशेष. विद्यमान आमदार आणि समर्थकांच्या संख्येच्या आधारे अजित पवार महायुतीकडे ६० ते ६५ जागांची मागणी करत आहे, परंतु शिंदे गटाने २८८ विधानसभा जागांपैकी १०० जागांची मागणी केल्यामुळे अजित पवारांना जागा मिळण्यात अडचणी येत आहेत. तर भाजप आपल्या मित्रपक्ष राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.





