मुंबई : मुंबईतील स्वच्छता हा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय असतो. हा विषय मुंबई महापालिकेकडून आयोजित घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगार, कर्मचाऱ्यांसमवेत संवाद कार्यक्रमातही चर्चेला आला. महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी शिवाजी मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात कामगार, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मात्र हा संवाद साधताना अश्विनी जोशी यांनी कामगार, कर्मचाऱ्यांना स्वच्छतेविषयी खडेबोल सुनावले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण ३० टक्के आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण इतर विभागांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. गैरहजेरीमुळे स्वच्छतेविषयक कार्यवाहीबरोबर प्रशासकीय अडचणींचाही सामना करावा लागतो. त्यामुळे गैरहजेरीचे प्रमाण कमी होणे गरजेचे असल्याचे अश्विनी जोशी यांनी उपस्थित स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे उपस्थित कर्मचारीही अवाक् झाले.
यावेळी घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त किरण दिघावकर, पर्यावरण विभागाचे उपायुक्त प्रशांत तायशेटे यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन खात्यातील अधिकारी, कामगार, मुकादम, मोटर लोडर, पर्यवेक्षकही उपस्थित होते. यावेळी आरोग्य चौक्यांच्या दुरुस्तीसाठी कालबद्ध मोहीम हाती घेतली जाईल आणि चौक्यांच्या ठिकाणी महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रसाधनगृहांसह मुलभूत सुविधा पुरवल्या जातील, असेही जोशी म्हणाल्या. त्याआधी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी, कामगारांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेत त्याचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. मुंबईकरांच्या आरोग्याची, पर्यावरणाची काळजी घेणारे स्वच्छता कर्मचारी दुर्लक्षित राहता कामा नयेत, अशी महापालिकेची भूमिका आहे. सार्वजनिक स्वच्छतेविषयक आव्हानांमध्ये वाढ होत आहे. या परिस्थितीतही स्वच्छता कर्मचारीअविरत कार्यवाही चौख बजावत आहेत. ही अभिमानाची बाब असली तरी स्वच्छता कामांत सुधारणांना संधी आहे, असेे ते यावेळी म्हणाले. स्वच्छता कर्मचाऱ्यांना गणवेश, हातमोजे आदी सुरक्षा साधने पुरवली जातात. मात्र या सुरक्षा साधनांचा वापर केला जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुकादम, पर्यवेक्षकांनी यांनी स्वच्छता कामगारांचे प्रबोधन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मुंबईकरांचे आरोग्य सांभाळणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आरोग्याबरोबरच कुटुंबीयांचे देखील आरोग्य जपण्याचे आवाहन त्यांनी केले. मुंबई महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभागात आतापर्यंत २७ हजार ९०० कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी ६ हजार ५०० सेवा सदनिका देण्यात आल्या आहेत. आश्रय योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या ४६ वसाहतींपैकी ३० वसाहतींचा पुनर्विकास केला जात आहे. एकूण सुमारे १२ हजार सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. कामगार सदनिकांचे विद्यमान क्षेत्रफळ ३०० चौरस फूट असेल. प्रस्तावित बहुमजली इमारतीत उद्यान, मनोरंजन केंद्र यासह आधुनिक सुविधांयुक्त दर्जेदार स्वरूपाच्या असतील, अशीही माहिती यावेळी संवाद कार्यक्रमात देण्यात आली.




