मुंबई : राज्यात येत्या शैक्षणिक वर्षात २०० नवीन कॉलेजे सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. यातील सर्वाधिक ५४ कॉलेजे रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालया अंतर्गत सुरू केली जाणार आहे. तर मुंबई विद्यापीठांतर्गत २४ नवीन कॉलेज सुरू करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दरवर्षी नवीन कॉलेजेस सुरू करण्याची मान्यता दिली जाते. यंदा राज्यात आर्ट्स, कॉर्मस, सायन्स शाखेच्या कॉलेजांबरोबरच विधी शाखेची कॉलेजे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. कायम विनाअनुदानित तत्त्वावर ही कॉलेजे सुरू करण्याची परवानगी उच्च शिक्षण विभागाने दिली आहे. त्याबाबतचा शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत विधी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्यातून या कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा असल्याचे दिसते. त्यामुळे यंदा मुंबई विद्यापीठांतर्गत नव्याने सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेल्या २४ कॉलेजांपैकी १० कॉलेज ही विधी शाखेची आहेत. त्यामध्ये पाच वर्षे आणि तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या कॉलेजांचा समावेश आहे.
यंदा नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठांतर्गतही (एसएनडीटी) मोठ्या प्रमाणात कॉलेज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यंदा एसएनडीटी विद्यापीठाच्या अंतर्गत ३४ कॉलेज सुरू करण्यास शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत २२, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ १५, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाअंतर्गत १३ कॉलेज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, यंदा रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालया अंतर्गत नव्याने ५४ कॉलेज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कॉलेजांमध्ये बी.ए. योगशास्त्र, बी. ए. वेदांग ज्योतिषी, बी. ए. ट्रॅव्हल अँड टुरिझम, बीएससी योगिक सायन्स, बी. ए. वेदविद्या, बी. ए. विशारद पाली, बी. ए. कीर्तनशास्त्र, डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन अँड केअर, बी.ए. विशारद संस्कृत आदी विविध अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.





