पुणे : पुण्यातल्या भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला झाला आहे. खातेधारकांच्या ४९३ एटीएम कार्ड्सचे क्लोन करुन त्यातून एक कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम लंपास करण्यात आलीय. भारती सहकारी बँकेची १ कोटी १५ लाख ७०० रुपयांची रक्कम लंपास झालेली आहे. सायबर चोरट्यांनी डिसेंबर २०२० ते २०२१ या काळामध्ये एटीएम कार्डचे क्लोन तयार करुन सदाशिव पेठ, आकुर्डी, धनकवडी, बाणेर, कोथरुड, नवी मुंबई, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर,वरळी आणि दिल्लीच्या एटीएम केंद्रांतून पैसे लंपास केलेले आहेत.
तब्बल ४३९ एटीएम कार्ड्समधील ही रक्कम चोरट्यांनी पळवली आहे. १ हजार २४७ व्यवराहातून १ कोटी १५ लाख रुपये लांबवण्यात आले. यापूर्वी कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला झाला होता. त्यातून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबवल्याची घटना २०१८मध्ये घडली होती. भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला झाल्याची बाब बँकेच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांनात धाव घेतली आहे. कार्यकारी संचालक सर्जेराव जगन्नाथ पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.





