मुंबई : महामुंबई क्षेत्रात निर्माणाधीन असलेल्या सहा उन्नत मेट्रोसाठीच्या ३६०३ खाबांची उभारणी करण्यात आली आहे. या सर्व सहा मेट्रोचा विचार केल्यास ७३ टक्के खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. मेट्रो ५चा (ठाणे-भिवंडी) टप्पा १ सर्वाधिक जलदगतीने सुरू आहे. सध्या तीन मेट्रो मार्गिका सुरू झाल्या आहेत. तर सहा मेट्रोची उभारणी सुरू आहे. या सहा मेट्रोद्वारे मिरा-भाईंदर, ठाणे, भिवंडी, विक्रोळी, जोगेश्वरी, वडाळा, अंधेरी, मानखुर्द एकमेकांशी जोडले जाणार आहेत. एकाचवेळी बांधकाम सुरू असलेल्या या सहा मेट्रो मार्गिकांसाठी खांबांची उभारणी जोमाने सुरू आहे. एकूण ४९२९पैकी ३६०३ खांबांची उभारणी पूर्ण झाल्याचे मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) म्हटले आहे.
मेट्रोच्या बांधकाम प्रक्रियेदरम्यान पिअर कॅप्स, यू-गर्डर आणि आय-गर्डर यांसारख्या अवजड प्रीकास्ट (पूर्वनिर्मित) घटकांवर आधारित कास्टिंगद्वारे उभारणी केली जाते. हे प्रीकास्ट घटक वेगवेगळ्या कास्टिंग यार्ड्सवर तयार करून तेथून ते प्रत्यक्ष बांधकाम स्थानावर नेले जातात. बांधकामाच्या ठिकाणी ३५० ते ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनद्वारे उभारणी केली जाते. या मेट्रो मार्गिका महामार्ग किंवा महत्त्वाच्या रस्त्यांवर उभ्या होत आहेत.
‘मेट्रो कॉरिडोर शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य आहे. निर्माणाधीन सहा मेट्रोखेरीज गायमुख ते शिवाजी चौक (मिरा रोड) दरम्यान मेट्रो मार्ग १०साठी विविध परवानग्या मिळविण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. मेट्रो मार्ग १२ (कल्याण-तळोजा)साठी सामान्य सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे आणि स्थापत्य कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे’, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.





