मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी अत्याधुनिक चित्रनगरी उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध प्रकारचे भव्य सेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय मराठी चित्रपटांना अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलतेमुळे मराठी चित्रपटांनी देशभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी रंगभूमीची परंपरा आजही तितक्याच ताकदीने जपली जात असून त्याच सांस्कृतिक वारशाच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टी सातत्याने पुढे जात आहे. या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हेलन, अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, किरण शांताराम यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. सलीम खान यांच्या वतीने अभिनेत्री हेलन यांनी हा सन्मान स्वीकारला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या योगदानाचाही गौरव केला. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या संगीतातून मराठी संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रभावना प्रभावीपणे जगासमोर मांडली असल्याचे सांगताना ‘मोगरा फुलला’, ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’, ‘रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा’ आणि ‘शिवकल्याण राजा’ यांसारख्या अजरामर रचनांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. तसेच सलीम-जावेद या जोडीने भारतीय चित्रपटसृष्टीला नवे वळण दिले असून ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘शोले’सारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रभावी व्यक्तिरेखा निर्माण केल्या तसेच ‘अँग्री यंग मॅन’ची संकल्पना लोकप्रिय करण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या अभिनयाचे कौतुक करताना त्यांनी त्यांना कलेतील ‘३६० डिग्री मॅन’ संबोधले आणि ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी तीन दशकांच्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारत ‘मर्दानी’सारख्या चित्रपटांतून स्त्रीकेंद्री कथांना बळ दिल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्य शासन मराठी चित्रपटसृष्टीला आधुनिक सुविधा, तांत्रिक बळ आणि अधिक प्रदर्शन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, मराठी चित्रपटांना देश-विदेशात अधिक व्यापक ओळख मिळावी, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.






