मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती आणताना आणखी एक गंभीर अपघात घडला आहे. काही दिवसांपूर्वी २२ फूट उंच भुलेश्वरचा राजा गणेशमूर्ती आणताना झालेल्या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता धारावी परिसरात प्रेमनगरचा महाराजा गणेशमूर्ती आगमनादरम्यान मूर्ती ट्रॉलीवरून कोसळल्याने २ गणेशभक्त जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, धारावीतील प्रेमनगर परिसरात ओम शक्ती वेल्फेअर फाऊंडेशनतर्फे सुमारे १५ फूट उंच गणेशमूर्ती मोठ्या उत्साहात आणली जात होती. नवपाडा परिसरातून ट्रॉलीच्या सहाय्याने मिरवणुकीसह मूर्ती प्रेमनगरकडे नेण्यात येत होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मिरवणूक पुढे सरकत असताना कुर्ल्यातील शीतल तलावाजवळील स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल बिघडला. स्पीड ब्रेकर ओलांडताना अचानक मूर्तीचा समतोल ढासळला आणि संपूर्ण गणेशमूर्ती ट्रॉलीवरून खाली कोसळली. या घटनेत मूर्तीच्या जवळ उभे असलेले संतोष जयस्वर आणि रोहित जयस्वर हे दोन गणेशभक्त जखमी झाले. तसेच ट्रॉलीजवळ असलेल्या आणखी एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना त्वरित भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोघांना दुखापत झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अपघातात गणेशमूर्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मंडळाने धार्मिक परंपरेनुसार त्या मूर्तीचे शीतल तलावात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच मंडळावर मोठे संकट ओढवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवून परिस्थिती नियंत्रणात आणली. काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. पोलिसांकडून अपघाताची कारणे आणि ट्रॉलीवरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांची चौकशी केली जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या आणि उंच मूर्तींची वाहतूक करताना सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विशेषतः स्पीड ब्रेकर, अरुंद रस्ते, वीजवाहिन्या आणि वळणाच्या ठिकाणी अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनानेही यापूर्वी आवाहन केले आहे. भुलेश्वरच्या राजाच्या दुर्घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच घडलेल्या या दुसऱ्या अपघातामुळे गणेशमूर्ती वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






