नागपूर : पुण्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून झालेल्या राजकीय घडामोडींनंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ हा संवाद कार्यक्रम नागपुरात आयोजित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुण्यानंतर थेट नागपूरची निवड होत असल्याने या कार्यक्रमाकडे केवळ विद्यार्थी संवाद म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय पटावर महत्त्वाच्या रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि भाजपचा बालेकिल्ला मानले जाते. त्यामुळे अशा संवेदनशील राजकीय पार्श्वभूमीवर राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाद्वारे युवकांच्या शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, महागाई, कौशल्य विकास आणि करिअरशी संबंधित प्रश्नांना थेट स्पर्श करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी थेट संवाद साधत पक्षाची भूमिका मांडण्यावर काँग्रेसचा भर असून, विदर्भातील युवकांमध्ये संघटनात्मक बळ वाढवण्याचाही प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कार्यक्रमाची तारीख आणि स्थळ अद्याप निश्चित झालेले नसले तरी त्यासाठी पक्षांतर्गत तयारी सुरू असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील कार्यक्रमानंतर अवघ्या काही दिवसांत राहुल गांधी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून बुधवारी त्यांनी नाशिकमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील संघटनात्मक परिस्थिती, आगामी निवडणुका, युवकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आणि पक्ष विस्ताराच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचवेळी ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम नागपुरात घेण्याबाबत सकारात्मक संकेत देण्यात आल्याचेही समोर आले आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांशी थेट संवाद साधण्यावर काँग्रेसचा भर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. नागपूरची निवड ही राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात असून विदर्भातील बदलत्या राजकीय वातावरणात काँग्रेस नव्या समीकरणांची चाचपणी करत असल्याचे चित्र दिसत आहे. कार्यक्रमाचे स्वरूप, सहभागी होणारे विद्यार्थी, संवादाचे विषय तसेच आयोजनाची रूपरेषा याबाबत पक्षाकडून अंतिम निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिकृत घोषणा झाल्यानंतर या कार्यक्रमाचे नेमके वेळापत्रक जाहीर होणार असून, राहुल गांधींच्या नागपूर दौऱ्याकडे राज्यातील राजकीय पक्षांसह युवकांचेही लक्ष लागले आहे.






