मुंबई : मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील सुंदरबाग परिसरात रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना अन्नबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, बाधितांमध्ये लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळातच नागरिकांना उलट्या, जुलाब, तीव्र पोटदुखी, ताप आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. एकामागोमाग अनेकांची प्रकृती बिघडू लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. तातडीने सर्वांना कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गंभीर लक्षणे असलेल्या १४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले, तर दोन जणांवर बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये तीन ते चौदा वर्षे वयोगटातील अनेक लहान मुलांचा समावेश असल्याने ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे. या प्रकारामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आणि स्वच्छतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांनी स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांकडे आकर्षित होण्याऐवजी त्यांच्या गुणवत्तेची आणि स्वच्छतेची खात्री करूनच ते खावेत, असे आवाहनही आरोग्य तज्ज्ञांकडून केले जात आहे.
या घटनेत अन्नबाधा झालेल्यांमध्ये रुद्र पाशा (३), अस्मिया पाशा (८), सुफियान पाशा (७), निहत पाशा (१०), जिजाना पाशा (१३), कौसर शेख (१४), अबान इम्रान खान (१४), शकीर अली (३१), सबिरा बानो (२६), मुस्कान शेख (२४), प्रीती विश्वकर्मा (२२), रोशनी विश्वकर्मा (१८), नसरीन आलम शेख (१९) आणि इम्रान खान (४०) यांचा समावेश आहे. तर शुबी खान (१४) आणि शाकिया खान (१३) यांच्यावर ओपीडीमध्ये उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिश नायर यांनी भाभा रुग्णालयाला भेट देत सर्व रुग्णांची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली तसेच आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या उपचार सुरू असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संबंधित मोमोज विक्रेत्याच्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची आणि स्वच्छतेची चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या प्रकरणाची सखोल तपासणी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर अधिक कडक तपासणी आणि स्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.






