वसई : सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या वाढत्या किमती आणि टंचाईमुळे सर्वसामान्य ग्राहकांची मोठी कोंडी झाली आहे. श्रावण महिना, रक्षाबंधन, ओणम, गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सव या सणांमुळे बाजारात साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असतानाच उत्पादनात झालेली घट आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे किरकोळ बाजारात साखरेचे दर झपाट्याने वाढले आहेत. परिणामी वसईतील अनेक किराणा दुकाने आणि सुपरमार्केटमध्ये साखरेची विक्री मर्यादित करण्यात आली असून, प्रति ग्राहक केवळ एक किलो साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कमी दरात साखर खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना निराश होऊन परतावे लागत आहे. गेल्या महिन्यापर्यंत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने मिळणारी साखर आता ६५ ते ७० रुपये, तर काही ठिकाणी ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. दरवाढ असूनही सणांसाठी लागणारी साखर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची दुकानांवर मोठी गर्दी होत आहे. विशेषतः सुपरमार्केटमध्ये तुलनेने कमी दरात साखर उपलब्ध असल्याने सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, मर्यादित साठा आणि वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक सुपरमार्केटने प्रत्येक ग्राहकाला फक्त एक किलो साखर देण्याचा नियम लागू केला आहे. त्यामुळे मोठ्या कुटुंबांना किंवा सणासाठी अधिक प्रमाणात साखर लागणाऱ्या ग्राहकांना अनेक ठिकाणी फेऱ्या माराव्या लागत आहेत.
यंदा प्रतिकूल हवामान, अतिवृष्टी, पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव आणि ऊस उत्पादनातील घट यामुळे देशातील साखर उत्पादनात सुमारे २७ लाख टनांची घट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला असून साखरेच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. त्यातच सणासुदीच्या काळात मिठाई, फराळ, प्रसाद आणि विविध खाद्यपदार्थांसाठी साखरेची मागणी वाढल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. साखरेच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडले असून गृहिणींना घरखर्चाचा ताळमेळ बसवताना मोठी कसरत करावी लागत आहे. दरवाढीमुळे अनेकांनी पर्याय म्हणून गुळाची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. श्रावण आणि गणेशोत्सवाच्या काळात गुळाची मागणी नेहमीच वाढत असते. मात्र यंदा साखरेच्या टंचाईमुळे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर गुळाकडे वळल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वाढत्या मागणीमुळे गेल्या पंधरा दिवसांत गुळाच्या दरातही १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गुळाच्याही किमती वाढू लागल्याने ग्राहकांसमोर पर्याय कमी होत चालले आहेत. साखरेच्या वाढत्या किमती आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनेही महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. १० मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या घाऊक ग्राहकांसाठी साठा मर्यादा कमी करून केवळ १५ दिवसांपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांतर्गत मिठाई उत्पादक, बेकरी उद्योग, शीतपेय उत्पादक आणि खाद्यप्रक्रिया उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा नियम लागू राहणार असून, साठेबाजी रोखून बाजारात साखरेचा नियमित पुरवठा सुरू ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, किरकोळ बाजारात दर कमी होण्यासाठी काही काळ लागू शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. व्यापाऱ्यांच्या मते, साखरेचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत दरात फारशी घट होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे, नागरिकांनीही गरजेपुरतीच साखर खरेदी करून अनावश्यक साठा टाळावा, असे आवाहन विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. सणांच्या काळात साखरेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत बाजारातील परिस्थितीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वसईसह पालघर जिल्ह्यातील अनेक भागांत साखरेची उपलब्धता मर्यादित झाल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, सणासुदीच्या काळात वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.






