मुंबई : समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही केवळ पुरस्कार देण्याची औपचारिकता नसून, त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा देण्याची आणि नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. मेघाश्रेय फाउंडेशनतर्फे मुंबईतील द सेंट रेजिस हॉटेलच्या अॅस्टर बॉलरूममध्ये आयोजित ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान-२०२६’ सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संघटन प्रभारी रामलाल तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी विज्ञान, संशोधन, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, संगीत, कला-संस्कृती, चित्रपट, अध्यात्म आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १८ मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. आपल्या भाषणात राज्यपालांनी समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत अशा व्यक्तींच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतो आणि देशाच्या विकासाला नवी दिशा मिळते, असे सांगितले. त्यांनी नमूद केले की, कोणत्याही व्यक्तीचे यश केवळ वैयक्तिक प्रगतीपुरते मर्यादित राहू नये, तर त्याचा लाभ समाजालाही झाला पाहिजे. समाजातील प्रत्येक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या काळात माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, वास्तुकला, उद्योग, कला, शिक्षण आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्ती समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कार्यातून नव्या संधी निर्माण होत असून देशाच्या प्रगतीला चालना मिळत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे म्हणजे समाजात सकारात्मक मूल्यांची जपणूक करणे होय, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भारतीय संस्कृतीतील ज्ञान, विज्ञान, शिस्त आणि विविधतेच्या मूल्यांवरही विशेष भाष्य केले. भारतीय परंपरेमध्ये ज्ञान आणि विज्ञानाला नेहमीच सर्वोच्च स्थान देण्यात आले असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी केला गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शिस्त ही व्यक्तीच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी शिस्त ही कोणतेही बंधन नसून स्वातंत्र्याकडे नेणारी शक्ती असल्याचे स्पष्ट केले. समाजात एकसारखेपणा अपेक्षित नसून विविधतेचा स्वीकार, परस्परांचा आदर आणि सहकार्याची भावना यामुळे समाज अधिक सक्षम आणि सशक्त बनतो, असेही त्यांनी सांगितले. आज सन्मानित झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि विशेषतः युवा पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेची भावना जोपासली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. समाजात सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताची भावना वृद्धिंगत करण्यासाठी अशा सन्मान सोहळ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या योगदानाची दखल घेणे हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी मेघाश्रेय फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमात सन्मानित झालेल्या मान्यवरांनीही आपल्या कार्याचा प्रवास, आलेले अनुभव आणि समाजासाठी काम करण्यामागील प्रेरणा याबाबत मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक कार्याला प्रोत्साहन मिळते, विविध क्षेत्रांतील योगदानाची योग्य दखल घेतली जाते आणि नव्या पिढीला राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा मिळते, अशी भावना व्यक्त केली. आयोजन, सन्मानित व्यक्तींची निवड आणि समाजहिताच्या कार्याला मिळालेला गौरव यामुळे ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान-२०२६’ हा सोहळा प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.






