वसई : वसई-विरार शहरातील फेरीवाल्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वसई-विरार महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता अधिकृत ओळखपत्र दिले जाणार आहे. यासाठी येत्या १ सप्टेंबरपासून महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयांमार्फत कागदपत्र पडताळणी आणि माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पात्र फेरीवाल्यांना अधिकृत ओळख मिळणार असून शहरातील फेरीवाला व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्यास मदत होणार आहे. वसई-विरार शहरातील बाजारपेठा, रस्ते, पदपथ तसेच विशेषतः रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. शहरात वास्तव्यास असलेल्या फेरीवाल्यांसोबतच मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागांतून व्यवसायासाठी येणारे अनेक फेरीवालेही शहरातील गर्दीच्या ठिकाणी जागा व्यापत आहेत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना अडचणी येत असून पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा मिळत नाही. तसेच वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारच्या पथविक्रेता अधिनियम २०१४ अंतर्गत वसई-विरार महानगरपालिकेने २०१४-१५ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये शहरातील एकूण १५ हजार २१५ फेरीवाले पात्र ठरवण्यात आले होते. नियमानुसार सर्वेक्षणानंतर पात्र फेरीवाल्यांना ओळखपत्र देणे आणि त्यांच्यासाठी निश्चित फेरीवाला क्षेत्र तयार करणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून ही प्रक्रिया रखडलेली होती. फेरीवाल्यांचे नियमन करण्याची नागरिकांची मागणी, तसेच विविध फेरीवाला संघटनांकडून करण्यात आलेली आंदोलने यामुळे आता महापालिकेने पात्र फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रक्रियेत संबंधित फेरीवाल्यांना आवश्यक कागदपत्रे प्रभाग समिती कार्यालयात जमा करावी लागणार आहेत. महापालिका अधिकारी या कागदपत्रांची तपासणी करतील. त्यानंतर फेरीवाला ज्या ठिकाणी व्यवसाय करतो त्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित फेरीवाल्याचा युनिक आयडी तयार करण्यात येईल आणि त्यानंतर अधिकृत ओळखपत्र वितरित केले जाणार आहे. महापालिकेने २०१५ च्या सर्वेक्षणात नोंद असलेल्या सर्व पात्र फेरीवाल्यांना वेळेत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे. ओळखपत्र मिळाल्यानंतर फेरीवाल्यांना नियमानुसार व्यवसाय करता येणार असून प्रशासनालाही शहरातील फेरीवाल्यांची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवणे आणि शहरातील वाहतूक व पादचारी व्यवस्था सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :
१) व्यवसायाच्या ठिकाणाचा फोटो
२) व्यवसाय करत असलेल्या ठिकाणचा पत्ता
३) आधार कार्ड आणि रहिवासी दाखला
४) दोन छायाचित्रे






