मुंबई : वरळी सी फेस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना राष्ट्रप्रेम, संविधानाचा सन्मान आणि नवभारत उभारणीचा संदेश दिला. रॅलीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, भारतीय तिरंगा हा केवळ आपल्या हातात नसून प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि अंतःकरणात आहे. भारतीय संविधानाचा आदर, देशाचा स्वाभिमान आणि राष्ट्रभावना जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असून, नवभारत घडविण्यात प्रत्येकाने आपले योगदान दिले तरच तिरंग्याचा खरा सन्मान होईल. तिरंगा यात्रा ही केवळ एक रॅली नसून देशप्रेम जागविणारा आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणारा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, योगेश सागर, मिहिर कोटेचा, कॅप्टन तमिळ सेल्वन, राजहंस सिंह, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज समोर एकीकडे हिंद महासागर दिसत आहे, तर दुसरीकडे तिरंग्याचा महासागर पाहायला मिळत आहे. क्रांतिकारकांच्या बलिदानाने, सैनिकांच्या शौर्याने आणि स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षाने गौरवलेला तिरंगा चंद्र-सूर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत अभिमानाने फडकत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारताच्या विकास प्रवासाचाही आढावा घेताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनला असून, अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरल्याचा उल्लेखही त्यांनी केला. भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था विकसित होत असून, देशाची सर्वात मोठी ताकद म्हणजे युवा शक्ती असल्याचे ते म्हणाले. तिरंगा हातात घेऊन देशासाठी पुढे येणाऱ्या तरुणांना रोखण्याची ताकद कोणाकडेही नाही, असे सांगत त्यांनी भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचा विश्वास व्यक्त केला. काही परकीय शक्ती भारताची प्रगती रोखण्याचा प्रयत्न करत असल्या, तरी देशाचा विकासाचा प्रवास थांबवणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारताच्या संकल्पनेची पूर्तता आगामी काळात होईल आणि भारत जगाच्या नकाशावर अग्रस्थानी पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, रॅलीत हजारो मुंबईकर, युवक, विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट्स मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण वरळी सी फेस परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.





