वसई : रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणाची अंतिम मुदत आता अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने वसई- विरार परिसरातील अमराठी रिक्षाचालकांचा मराठी शिकवणी वर्गांकडे मोठा ओढा वाढला आहे. राज्य शासनाने अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषेत संवाद साधणे अनिवार्य केल्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत वसई- विरार परिसरातील सात हजारहून अधिक रिक्षाचालकांनी मराठी भाषा प्रशिक्षण पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनाही वेळेत प्रशिक्षण मिळावे यासाठी अतिरिक्त प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वास्तव्यास असूनही मराठीत संवाद न साधणाऱ्या रिक्षाचालकांचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर राज्य शासनाने परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून १ जूनपासून राज्यभर मराठी भाषा अभ्यास केंद्रे सुरू केली. या केंद्रांमध्ये रिक्षाचालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद कसा साधावा, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असून प्रत्येक चालकासाठी चार तासांचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव परिसरात परराज्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने अमराठी रिक्षाचालकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या भागांमध्ये विशेष प्रशिक्षण केंद्रांद्वारे मोठ्या प्रमाणावर मराठीचे धडे दिले जात आहेत. अंतिम मुदत जवळ आल्यामुळे जुलै महिन्याच्या उत्तरार्धात प्रशिक्षणासाठी रिक्षाचालकांची गर्दी लक्षणीयरीत्या वाढली आहे.
रिक्षाचालकांची वाढती संख्या आणि मर्यादित वेळ लक्षात घेऊन प्रशिक्षण व्यवस्थेतही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला वसई- विरार शहरात नऊ प्रशिक्षण केंद्रांद्वारे वर्ग घेतले जात होते. मात्र, वाढत्या प्रतिसादामुळे गोंसालो गार्सिया महाविद्यालयासह अन्य ठिकाणी अतिरिक्त प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच पूर्वी सात दिवस चालणारे प्रशिक्षण आता दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल, अशा पद्धतीने वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती या उपक्रमाच्या पालघर जिल्हा समन्वयक सीमा पाटील यांनी दिली. परवाना रद्द होण्याची भीती आणि शासनाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी मोठ्या संख्येने रिक्षाचालक मराठी भाषा शिकण्यास पुढे येत आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चालकांची तोंडी परीक्षा घेतली जात असून, गेल्या दोन महिन्यांत सात हजारांहून अधिक रिक्षाचालकांनी प्रशिक्षणासह ही परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या उपक्रमामुळे रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढण्यासही हातभार लागणार आहे. शासनाच्या या उपक्रमाला वसई- विरार परिसरात चांगला प्रतिसाद मिळत असून, अंतिम मुदतीपूर्वी आणखी मोठ्या संख्येने रिक्षाचालक प्रशिक्षण पूर्ण करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






