विरार : मागील काही दिवसांपासून पर्जन्यवृष्टी आणि वादळी वाऱ्यांमुळे वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील जुन्या तसेच संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत कमकुवत झालेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून सी- १ प्रवर्गातील अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे निर्देश महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी दिले आहेत. वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती आहेत.
या इमारतींचे नुकताच महापालिकेने सर्वेक्षण करून धोकादायक व अतिधोकादायक इमारती घोषित करून नोटीसा बजावल्या आहेत. या नोटिसांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, केवळ धोकादायक घोषित झालेल्या इमारतीच नव्हे, तर अलिकडच्या काळात कोणत्याही वर्गवारीत नसलेल्या काही इमारतींमध्येही अचानक छत किंवा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीचे वय कितीही असले, तरी सर्व गृहनिर्माण संस्था, इमारत मालक व व्यवस्थापनाने दरवर्षी पात्र संरचनात्मक अभियंत्याकडून ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑडिट अहवालात नमूद केलेल्या दुरुस्त्या आणि मजबुतीकरणाची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. बीम, स्लॅब, पिलर किंवा भिंतींना मोठे तडे जाणे, काँक्रीट निखळून आतील लोखंडी सळया उघड्या पडणे, इमारत किंवा स्तंभ एका बाजूला झुकणे, मोठ्या प्रमाणावर प्लास्टर गळणे, इमारतीतून विचित्र आवाज येणे आणि पावसामुळे गंभीर स्वरूपाची गळती होणे ही इमारत धोकादायक असल्याचे प्रमुख संकेत आहेत. अशी चिन्हे आढळल्यास नागरिकांनी अशा वास्तूत राहणे टाळावे आणि तात्काळ पालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन ही प्रशासनाने केले आहे. महापालिकेच्या आदेशांचे उल्लंघन करणे, स्ट्रक्चरल ऑडिट न करणे किंवा अहवालानुसार वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे भविष्यात छत, स्लॅब कोसळणे अथवा संपूर्ण इमारत कोसळून जीवित व वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण कायदेशीर व नैतिक जबाबदारी संबंधित इमारत मालक, विकासक आणि गृहनिर्माण सोसायटीवरच राहील. अशा कोणत्याही दुर्घटनेस महापालिका प्रशासन जबाबदार असणार नाही, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महापालिकेच्या ०२५०-२३३४५४६ / २३३४५४७ / ८६६९९७६१०१ / ७०५८९१११२५ या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





