पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकरी भाविकांसाठी व्यापक, दर्जेदार आणि तातडीच्या आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी केली. ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत तब्बल ७ लाख ४७ हजार १७८ वारकरी भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. पालखी मार्ग तसेच पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांमधून ७ लाख ४२ हजार ७३१ बाह्यरुग्णांवर उपचार, ४ हजार ४४७ रुग्णांना आंतररुग्ण सेवा, तर १ हजार ६०० रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. वारीदरम्यान संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांवरही मोठ्या प्रमाणात उपचार करण्यात आले. यामध्ये ४० हजार ९३३ तापाचे रुग्ण, ११ हजार ४८६ उच्च रक्तदाबाचे रुग्ण, ९ हजार ९७३ मधुमेहाचे रुग्ण, २३ हजार १०२ तीव्र श्वसन संसर्गाचे रुग्ण, १९ हजार ४७७ अतिसाराचे रुग्ण, ५ हजार ४५५ आमांशाचे रुग्ण, तसेच २१४ रस्ते अपघातग्रस्त, ५१ हृदयविकाराच्या झटक्याचे रुग्ण, ३६५ श्वानदंशाची प्रकरणे आणि १ सर्पदंशाचे प्रकरण यांच्यावर उपचार करण्यात आले. याशिवाय ३ क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले असून इतर ६ लाख २९ हजार ६२९ रुग्णांनाही आवश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आली. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ६९ सुसज्ज आयसीयू, १५६ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि ३०२ तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत होते. याशिवाय प्रथमच एअर ॲम्बुलन्स सेवा, २४ तास आयसीयू सुविधा, महाआरोग्य शिबिर, मोफत चष्मा वाटप, पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य जनजागृती आणि डिजिटल मॅपिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या सर्व उपक्रमांमुळे वारकऱ्यांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळाल्याने वारी अधिक आरोग्यदायी आणि सुकर ठरली.
आषाढी वारी २०२६ दरम्यान मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या ‘आरोग्यसंपन्न वारी’ वेब ॲपला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेब ॲपचा १ लाख ८ हजार ३८ वारकरी भाविकांनी लाभ घेतला असून, आवश्यक आरोग्य सेवा आणि इतर सुविधा सहज उपलब्ध झाल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. लाखो वारकऱ्यांना प्रवासादरम्यान सुरक्षित, सुलभ आणि तात्काळ आरोग्य सेवा मिळाव्यात या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या या वेब ॲपमध्ये रुग्णवाहिका सेवा, डॉक्टरांची माहिती, आरोग्य केंद्रे, ‘आपला दवाखाना’, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, स्वच्छतागृहे, मुक्काम व विसावा स्थळे तसेच महत्त्वाचे संपर्क क्रमांक यांसह विविध अत्यावश्यक सेवांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली होती. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी, वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध व्हावा तसेच आवश्यक आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हे वेब ॲप अत्यंत प्रभावी ठरले. वारीदरम्यान मोठ्या संख्येने भाविकांनी या डिजिटल सुविधेचा वापर करून विविध सेवांचा लाभ घेतला. राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाने पारंपरिक वारीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आरोग्य व्यवस्थापन अधिक सक्षम केले असून ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ ही संकल्पना यशस्वीपणे साकार करत लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि आरोग्यसंपन्न करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.






