छत्रपती संभाजीनगर : मान्सूनच्या आगमनानंतरही समाधानकारक पाऊस न झाल्याने मराठवाड्यातील पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. सुरुवातीला काही दिवस पाऊस झाल्यामुळे बंद करण्यात आलेले पाणीटँकर पुन्हा सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पावसाने पुन्हा ओढ दिल्याने छत्रपती संभाजीनगरसह विभागातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, सध्या १८२ गावे आणि ११७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या भागांसाठी एकूण ३०३ टँकर कार्यरत असून, त्यापैकी सर्वाधिक ११६ टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर टँकर बंद करण्याची पद्धत असली, तरी यंदा मान्सूनचे उशिराने आगमन आणि त्यानंतरही अपुरा पाऊस झाल्यामुळे परिस्थिती वेगळी निर्माण झाली आहे. पाणीटंचाई कायम असल्याने जिल्हाभरातून पुन्हा टँकर सुरू करण्याच्या मागण्या प्रशासनाकडे येऊ लागल्या. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन अनेक भागांत पुन्हा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, ७ जुलैच्या अहवालात मराठवाड्यातील १०३ गावे आणि ८४ वाड्यांमध्ये २०० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. त्यासाठी १५ शासकीय आणि १८५ खासगी टँकर, तसेच ६९१ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. त्या वेळी छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये एकही टँकर सुरू नव्हता, तर जालना जिल्ह्यातील ७० गावे आणि ३२ वाड्यांना १०७ टँकरद्वारे सर्वाधिक पाणीपुरवठा केला जात होता.
मात्र, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. १४ जुलैच्या शासकीय अहवालानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११६ टँकर, जालना जिल्ह्यात ९२, बीडमध्ये ६६, नांदेडमध्ये १५, परभणीत १२, तर हिंगोली आणि लातूरमध्ये प्रत्येकी एक टँकर सुरू आहे. विशेष म्हणजे, धाराशिव जिल्ह्यात अद्यापही एकही टँकर सुरू नाही. या पाणीपुरवठ्यासाठी विभागातील ८७४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने भूजलपातळीत पुरेशी वाढ झाली नाही. त्यात जुलै महिन्यातही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे अनेक गावांतील विहिरी आणि जलस्रोत कोरडे पडले असून, पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे प्रशासनाला ऐन पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागत आहे. हवामानातील अनिश्चिततेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता वाढली असून, पुढील काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर आणि इतर उपाययोजना करण्याची तयारीही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.






