सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, शुद्ध आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पंढरपूर शहरात विशेष अन्न सुरक्षा तपासणी मोहीम राबवली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शहरातील २१७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून विविध खाद्यपदार्थांचे १७२ नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने तीन आस्थापनांचे व्यवसाय परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली. या विशेष मोहिमेत हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी, प्रसाद विक्रेते आणि इतर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर अचानक तपासण्या करण्यात आल्या. अन्नपदार्थांची स्वच्छता, साठवणूक, वापरले जाणारे खाद्यतेल, कृत्रिम रंग तसेच इतर घटकांच्या गुणवत्तेची काटेकोर पडताळणी करण्यात आली. तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यामुळे मंगलमुर्ती मिसळ व भेळ (तीन रस्ता, शेगाव दुमाला), हॉटेल स्वरा अँड चायनिज सेंटर (शेगाव दुमाला) आणि हॉटेल श्री विष्णु सहस्रनाम (शेगाव दुमाला) या तीन आस्थापनांचे व्यवसाय परवाने तातडीने निलंबित करण्यात आले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने देशभरातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्याने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांमुळे भाविकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने सर्व व्यावसायिकांना स्वच्छता, गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. दरम्यान, आषाढी वारी २०२६ दरम्यान अन्न व औषध प्रशासनाची २० विशेष तपासणी पथके पंढरपूर आणि परिसरात कार्यरत असून, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा भेसळीबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी टोल-फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वारकरी आणि भाविकांना सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम वारी काळात सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






