पुणे : पुणे शहरातील वाहतूक शिस्तीला चालना देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘नो पार्किंग’मध्ये उभी केलेली वाहने उचलण्याची टोईंग कारवाई तब्बल सहा महिन्यांनंतर पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना आता दंडासह अतिरिक्त टोईंग शुल्कही भरावे लागणार आहे. वाहन उचलण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचा करार डिसेंबर २०२५ मध्ये संपुष्टात आल्यामुळे ही कारवाई बंद करण्यात आली होती. त्यानंतर नव्या निविदा प्रक्रियेचे काम सुरू असले तरी त्याला अद्याप अंतिम स्वरूप मिळालेले नाही. परिणामी, राज्य सरकारने विद्यमान कंत्राटदारालाच आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयानंतर शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि गर्दीच्या भागांमध्ये पुन्हा टोईंग कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहतूक पोलिसांकडून ‘नो पार्किंग’मध्ये उभी असलेली वाहने टोईंगद्वारे उचलली जात होती. या कारवाईअंतर्गत प्रत्येक वाहनावर दंडासह शुल्क आकारले जात होते. मात्र, करार संपल्याने ही प्रक्रिया अचानक थांबली होती. त्यामुळे नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांमध्ये नाराजी होती, तर बेशिस्त वाहनचालकांना याचा फायदा मिळत होता. शहरात आधीच वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडी गंभीर बनली असताना, चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांमुळे परिस्थिती आणखी बिकट होत होती.
टोईंग कारवाई बंद असलेल्या गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत अनेक वाहनचालकांनी प्रमुख रस्ते, बाजारपेठा, चौक आणि व्यावसायिक भागांमध्ये सर्रास नियमबाह्य पार्किंग सुरू केले होते. याचा थेट परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला आणि अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंडी वाढली. लक्ष्मी रोड, जंगली महाराज रस्ता, एफ.सी. रोड, कर्वे रोड, स्वारगेट, हडपसर, कोथरूड आणि कॅम्प यांसारख्या वर्दळीच्या भागांमध्ये नागरिकांना दररोज वाहतूक समस्यांचा सामना करावा लागत होता. आता टोईंग कारवाई पुन्हा सुरू झाल्यामुळे ‘नो पार्किंग’मध्ये वाहन उभे करणाऱ्या चालकांना दंडासह वाहन उचलण्याचे शुल्क भरावे लागणार आहे. वाहन टोईंग झाल्यानंतर ते परत मिळवण्यासाठी संबंधित वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडे जाऊन आवश्यक दंड आणि शुल्क भरून वाहन ताब्यात घ्यावे लागते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या खिशाला आर्थिक फटका बसणार आहे. वाहतूक पोलिसांच्या मते, रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने उभी केलेली वाहने ही वाहतूक कोंडीची प्रमुख कारणांपैकी एक आहेत. अशा वाहनांवर सातत्याने कारवाई केल्यास रस्ते अधिक मोकळे राहतील आणि वाहतुकीचा वेग सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे नागरिकांनी केवळ अधिकृत पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करावीत, अन्यथा दंड आणि अतिरिक्त शुल्काला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.







