मुंबई/पुणे : आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने व्यापक नियोजन केले असून यंदा राज्यभरातून पाच हजार पाचशे विशेष बसेस चालविण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आषाढी यात्रेदरम्यान वारकरी मोठ्या संख्येने पायी, रेल्वे, खासगी वाहने तसेच एसटीच्या माध्यमातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पार्श्वभूमीवर भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस किंवा त्याहून अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बससेवांमध्ये शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम ठेवण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सुविधा तसेच महिलांसाठी प्रवासभाड्यात विशेष सवलत उपलब्ध राहणार आहे. मागील वर्षी आषाढी यात्रेदरम्यान एसटीने मोठ्या प्रमाणावर विशेष बससेवा चालवून लाखो भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा त्याहून अधिक सक्षम आणि व्यापक नियोजन करण्यात आल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
वारी काळात सेवा बजावणाऱ्या चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांच्या सुविधांवरही विशेष भर देण्यात आला आहे. यात्रेदरम्यान रात्रंदिवस काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून त्यामुळे त्यांना अधिक उत्साहाने सेवा देता येणार आहे. एकादशीच्या दिवशी आणि त्यानंतर परतीच्या प्रवासात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा कर्मचारी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम करणार आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंढरपूर येथे चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार असून तेथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन सुविधा आणि इतर आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वारकऱ्यांना कोणतीही अडचण न येता विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचता यावे आणि परतीचा प्रवासही सुरक्षित व्हावा यासाठी एसटीची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र कार्यरत राहणार आहे. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून महामंडळ यात्राकाळात समर्पित भावनेने काम करणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे राज्यभरातील भाविकांनी एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.







