मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘प्रवेशोत्सव’ उपक्रमांतर्गत नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी घाटकोपर पूर्व येथील पंतनगर परिसरातील महानगरपालिका शाळा क्रमांक ३ मध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्याचे सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दप्तर, पाठ्यपुस्तके आणि लेखन साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, शाळेच्या पहिल्या दिवसाची आनंददायी सुरुवात व्हावी आणि शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे संपूर्ण शाळा परिसर चैतन्यमय झाला होता.
यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नियमित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. जिज्ञासू वृत्ती जोपासा, नवीन गोष्टी शिकण्याची सवय लावा आणि उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने परिश्रम करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध शैक्षणिक उपक्रम आणि सुविधा राबवत असल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमाला आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, नगरसेविका राखी जाधव, मुख्याध्यापिका मीना आढव तसेच शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल नवचैतन्य निर्माण झाले असून शाळेच्या पहिल्याच दिवशी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.






