मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जारंगे पाटील यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या या प्रश्नावर निर्णय घेत राज्य सरकारने ८ जिल्ह्यांतील ३४ मृत आंदोलकांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी एकूण ३ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान एकूण ३०९ आंदोलकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांसाठी २७ कोटी ५० लाख रुपयांची मदत मंजूर केली होती. मात्र काही वारसदारांना मदत मिळणे बाकी असल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता.
अंतरवाली सराटी येथे झालेल्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उर्वरित वारसदारांना मदत देण्याची मागणी केली होती. त्यानंतर जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रलंबित प्रकरणांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने तातडीने निधी मंजूर केला आहे. या मदतीचा लाभ बीड जिल्ह्यातील १५, धाराशिवमधील ५, परभणीतील ४, नांदेडमधील ३ तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका मृत आंदोलकाच्या कुटुंबाला मिळणार आहे. राज्य सरकारने आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






