मुंबई : डिजिटल पेमेंटचा वापर वाढत असताना रेल्वे तिकीट काढताना पैसे वजा होऊनही तिकीट न मिळण्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. अशा प्रवाशांना रिफंड मिळवण्यासाठी विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वाणिज्य विभागाने ‘SARAL’ (स्मार्ट असिस्टन्स अँड रिफंड ॲक्सेस लिंक) हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. १८ मार्च २०२६ रोजी सुरू करण्यात आलेल्या या पोर्टलला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तक्रार निवारण प्रक्रियेतही मोठे यश मिळाले आहे. १८ मार्च ते २९ मे २०२६ या कालावधीत पोर्टलवर एकूण १,८६६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १,७२३ तक्रारींचे यशस्वी निवारण करण्यात आले असून १२७ तक्रारी सध्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे या पोर्टलचा तक्रार निवारण दर ९२.३ टक्के इतका नोंदवला गेला आहे.
तक्रारींच्या स्वरूपाचा विचार करता सर्वाधिक १,५२६ प्रकरणे काउंटर तिकिटांशी संबंधित होती. याशिवाय RailOne संदर्भातील १९५ आणि एटीव्हीएम (ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन) संदर्भातील १४५ तक्रारी नोंदवण्यात आल्या. अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) अंतर्गत ७१५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६४६ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, तर ६९ प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) अंतर्गत १,१३१ तक्रारींपैकी १,०७७ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून ४८ तक्रारींवर प्रक्रिया सुरू आहे. तसेच पार्सल सेवांशी संबंधित २० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १० प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे. तक्रार निवारणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले ‘SARAL’ पोर्टल प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.







