वसई : पुणे येथील पिंपरी चिंचवड व हडपसर येथे विषारी दारूच्या सेवनामुळे १६ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मिरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तालयाने धडक कारवाया सुरू केल्या आहेत. विरार गुन्हे शाखा कक्ष ३ व पेल्हार गुन्हेप्रकटीकरण शाखेच्या पथकाने दुर्गम जंगलांमध्ये सुरू असलेल्या दोन वेगवेगळ्या बेकायदेशीर हातभट्ट्यांवर छापे टाकून पोलिसांनी एकूण १ लाख ६९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आला आहे.या प्रकरणी दोन महिलांवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली कारवाई ही २९ मे २०२६ रोजी पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसई फाट्याजवळील रिचर्ड कंम्पाऊन्ड, मनिचा पाडालगतच्या जंगलात अशीच कारवाई करण्यात आली.
सहाय्यक फौजदार शिवाजी पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, जंगलातील एका तात्पुरत्या शेडमध्ये चालणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकण्यात आला. तेथून पोलिसांनी १ लाख ७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. येथीलही साधनसामग्री वाहून नेणे अशक्य असल्याने ती जागेवरच नष्ट करण्यात आली. तर दुसरी कारवाई ही ३० मे २०२६ रोजी विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग सुरू असताना, पोलीस हवालदार सुनिल पाटील यांना बरफपाडा येथील जंगलात छुप्या पद्धतीने गावठी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर, वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने जंगलात छापा टाकला. या कारवाईत ६२ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. जंगलातील दुर्गम रस्ता आणि वाहतुकीची अडचण लक्षात घेता, तपासणी पुरते दारूचे नमुने काढून उर्वरित दारू, रसायन (वॉश), ॲल्युमिनियमच्या टाक्या आणि प्लास्टिक ड्रम पंचांसमक्ष जागीच नष्ट करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोन्ही गावठी हातभट्ट्या कारवाया मध्ये १ लाख ६९ हजार किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून दोन महिलांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







