मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून ‘अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय उद्यान’ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. राज्याच्या वन विभागाने हा प्रस्ताव अतिरिक्त मुख्य सचिव (वन) यांच्याकडे पाठवला असून, त्यावर अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. प्रस्तावानुसार उद्यानाचे विद्यमान नाव बदलले जाणार असले, तरी ‘राष्ट्रीय उद्यान’ हा शब्द कायम ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे, जेणेकरून या क्षेत्राचा कायदेशीर आणि संरक्षित दर्जा अबाधित राहील. याच परिसरात जागतिक दर्जाचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी विद्यापीठ’ स्थापन करण्याचाही प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, या प्रस्तावामुळे पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
वन विभागाने राष्ट्रीय उद्यानाच्या आत विद्यापीठ उभारण्यास आक्षेप नोंदवत, त्यामुळे बिबट्यांसह इतर वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट केले आहे. बांधकामे, वाढती मानवी वर्दळ आणि वाहतूक यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. १९७२ च्या Wildlife Protection Act 1972 नुसार संरक्षित क्षेत्रात अशा संस्था उभारण्यास मर्यादा असल्याने विद्यापीठ उद्यानाबाहेरील बिगर-संवेदनशील भागात उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. पर्यावरणप्रेमींनीही या प्रस्तावातील अंतर्गत बांधकामांवर तीव्र चिंता व्यक्त केली असून, मुंबईची ‘फुफ्फुसे’ मानल्या जाणाऱ्या या उद्यानाचे संवर्धन महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. या उद्यानाला पूर्वी ‘कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान’ आणि नंतर ‘बोरीवली राष्ट्रीय उद्यान’ म्हणून ओळखले जात होते. १९८१ मध्ये त्याचे नामकरण माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र आणि काँग्रेस नेते संजय गांधी यांच्या नावावर करण्यात आले होते.







