पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे सुमारे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत चिमुकलीला पेरू खायला देण्याचे आमिष दाखवून शेताच्या दिशेने नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे. मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. गावातील नागरिकांनाही याबाबत माहिती देण्यात आली. शोधमोहीम सुरू असतानाच काही ग्रामस्थांनी मुलगी आरोपीसोबत जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर संशयिताचा शोध घेण्यात आला. दरम्यान, सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार, हत्या आणि संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, आरोपीने पेरू खायला देण्याच्या बहाण्याने मुलीला शेतात नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार करून हत्या केली. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असून आरोपीविरोधात भक्कम पुरावे न्यायालयात सादर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर पिंपळवंडी गावासह संपूर्ण जुन्नर तालुक्यात संतापाची भावना व्यक्त होत आहे. अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांनी गावातील बंद असलेल्या पोलीस चौकीचा मुद्दाही उपस्थित केला असून, गावात कायमस्वरूपी पोलीस अधिकारी नसल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या मते, गावात पोलीस चौकी नियमित सुरू असती, तर अशा घटनांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता आले असते. त्यामुळे तातडीने पोलीस चौकी सुरू करून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे पालकांमध्येही मोठी चिंता निर्माण झाली असून, मुलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून न्यायवैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. समाजात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना कोणतीही माफी मिळू नये आणि दोषींना तातडीने कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना आणि ग्रामीण भागात पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.





