मुंबई : राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारने आता कडक कारवाई सुरू केली आहे. सुरक्षा नियमांचे पालन न करता सुरू असलेल्या Ola, Uber आणि Rapido सारख्या सेवांना नियंत्रणात आणण्यासाठी परिवहन विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बाईक-टॅक्सी सेवा देणारी अॅप्स तातडीने बंद करण्याची तसेच संबंधित कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी सायबर क्राइम विभागाला पत्राद्वारे केली होती. त्यानंतर काही दिवस या कंपन्यांच्या सेवा ठप्प झाल्या होत्या. नंतर मुख्यमंत्री स्तरावरील चर्चेनंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र, आता या सेवांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. सरकारकडून महाराष्ट्रापुरती स्वतंत्र बाईक-टॅक्सी व्यवस्था विकसित करण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी विद्यमान अॅपमध्ये आवश्यक बदल केले जाणार आहेत.
नव्या प्रणालीअंतर्गत फक्त परवानाधारक वाहनांनाच बाईक-टॅक्सी सेवा देता येणार आहे. संबंधित कंपन्यांना त्यांच्या वाहनांचा परवाना क्रमांक अॅपमध्ये नोंदवणे बंधनकारक करण्यात येणार असून, त्यानंतरच ती वाहने ग्राहकांना दिसतील. सरकारच्या मते, या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ होईल आणि अनधिकृत वाहतूक सेवांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या कंपन्यांनाच राज्यात व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच बाईक-टॅक्सी संदर्भातील विद्यमान नियमांमध्येही लवकरच बदल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय प्रवासी सुरक्षेसह वाहतूक व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.







